मुक्ताईनगर ः आई-वडिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होईल, समाजात मुश्किल होईल किंवा आई वडिलांना मान खाली घालावी लागेल, अशी कोणतीही गोष्ट आपल्या हातून घडता कामा नये, असे वचन मुला-मुलींनी आज रोजी दिले पाहिजे त्यासाठी आजच्या काळात प्रत्येकाने विशेषतः मुलींनी त्यांचे चारित्र्य सांभाळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज यांनी मुक्ताईनगरात केल.े विनोदभाऊ सोनवणे मित्र परिवार योगराज फाउंडेशन तर्फे आयोजित विद्यार्थी तसेच पत्रकारांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरी महाराज बोलत होते. शहरातील जिजाऊ नगरातील वॉर्ड क्रमांक 12 मध्ये हा कार्यक्रम झाला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
गोपालदास महाराज, माहेरची साडी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल, मराठी टीव्ही सिरीयलमधील अभिनेता भाग्येश पाटील, मध्य प्रदेशातील खंडवा लोकसभेचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, बर्हाणपूरचे माजी महापौर अतुल भोसले, प्रमोद सोनवणे, नामदेवराव सोनवणे, .वत्सलाबाई नामदेवराव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी हितासाठी कटीबद्ध ः विनोद सोनवणे
प्रास्ताविक योगराज फाउंडेशनचे संचालक तथा मुख्य आयोजक विनोद सोनवणे यांनी केले. ते म्हणाले की, मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून विश्व निर्माण केले आहे परंतु समाजातील महत्त्वाचा घटक असलेला विद्यार्थी परीस्थितीमुळे मागे पडता कामा नये त्याला प्रोत्साहन मिळावे तसेच त्याला मदतीचा हात देण्यासाठी मी स्वतः तसेच योगराज फाउंडेशन सदैव तत्पर आहे. अभिनेता भाग्येश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
जीवन उद्ध्वस्त होईल अशी चूक करा नका
सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि भविष्यात खडतर प्रवास असताना प्रत्येक पाऊल सावधानतेने टाकावे ज्यामुळे जीवन उद्ध्वस्त होईल, अशी एकही चूक आपल्या हातून घडता कामा नये, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला. जीवनात कोणत्याही गोष्टीकडे आकर्षित होऊ नका. जीवनात मित्र निवडताना खूप काळजी घ्या. लव मॅरेजला माझा विरोध नाही परंतु जीवनाचा साथी आपल्या जीवनासाठी पात्र असाच असावा. आपले आई-वडील आपले दैवत आहे त्यामुळे ते सदैव आपला हितच पाहतात याची सदैव जाणीव ठेवावी हे विसरता कामा नये, असेही माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या.
याप्रसंगी यांचा झाला सन्मान
मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावीच्या 81 , इयत्ता बारावीच्या 50, नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 12 गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व पत्रकार यांचा पुष्पगुच्छ, शाल व स्मृतीचिन्ह देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थी सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत पाटील तर आभार आर.बी.महाजन यांनी मानले.