चोपडा (प्रतिनिधी) आईच्या निधनानंतर धार्मिक विधी करण्यासाठी गेलेला शेख रियाज शेख रहीम (वय १६, रा. काझी मोहल्ला, चोपडा) हा तरुण अंघोळीसाठी धरणाच्या पाण्यात उतरला. परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील मालापुर धरणात दि. ५ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. आईपाठोपाठ मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहरातील काझी मोहल्ला भागातील रहिवासी शेख रियाज शेख रहीम, शेख जुबेर शेख रहीम, शेख असद शेख रहीम, हे तीन भाऊ व त्यांचे नात्याने काका असलेले रफिक शेख रऊफ असे चार जण दि.५ रोजी दुपारी ३ वाजता दोन दुचाकीने मालापुर धरणावर गेले होते. शेख रियाज शेख रहीम यांच्या आई नजमाबी हीचे चाळीस दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दि ४ रोजी आईचे उत्तर कार्याचा धार्मिक विधी आटोपून धर्माच्या प्रथेनुसार मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी समुद्रात किंवा धरणाच्या पाण्यात माशांना चणे टाकण्याची प्रथा आहे. त्या प्रथेनुसार आज दुपारी शेख रियाज व त्याचे दोन मोठे भाऊ, काका असे चार जण दोन मोटर सायकलने मालापुर धरणात माशांना चणे टाकण्यासाठी गेले होते.
माशांना चणे टाकून चार ही जण धरणाच्या पाण्यात आंघोळ करतांना अचानक शेख रियाज शेख रहीम खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. शेख रियाज या सोळा वर्षीय मुलाच्या आईचे चाळीस दिवसांपुर्वीच निधन झाले. त्यानंतर धार्मिक विधी करण्यासाठी तो कुटुंबियांसह धरणावर गेला होता. विधी आटोपल्यानंतर तो अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर त्याचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे