नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “सरकारने जी तीन कृषी विधेयक मंजूर केली. त्या विधेयकांची कुठल्याही शेतकऱ्याने किंवा शेतकरी संघटनेने मागणी केली नव्हती. पण शेती क्षेत्र या काळात स्थिर होतं. त्यावेळीच हा बिझनेस कॉर्पोरेट हाऊसेसना दिसला. अदानी-अंबानी यांना शेती क्षेत्रात व्यापार करता यावा, लॉकडाऊनमधला त्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी पायघडया घालून ही तीन विधेयकं मंजूर केली” असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करताना आम्ही रस्ते रोखले. झाडं आडवी टाकली, टायर पेटवले पण रस्ता खोदण्याचं धाडस कधी केलं नव्हतं. पण सरकारनेच रस्त्यावर खंदक खोदून दिल्लीच्या दिशेने येणारे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखले” असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. “शेतकऱ्यांच्या मनात काय आहे?. त्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी आंदोलनाला प्रांतीक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आंदोलन कुठल्या जाती-धर्माचं नाही, देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे” असे राजू शेट्टी म्हणाले. “सरकार शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करतेय, पाण्याचा फवारा मारतेय त्यामुळे परिस्थिती चिघळतेय. शेतकरी अशांत झाला तर देश अशांत होईल. फक्त पंजाब, हरयाणा आणि उत्तर भारतातील शेतकऱ्यांच हे आंदोलन नाही. हे देशाचं आंदोलन आहे. याच भान सरकारने ठेवावं. सरकारची भूमिका आईची असली पाहिजे शेतकऱ्याला आरोपी ठरवू नये. त्याला समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची माथी भडकली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो” असे राजू शेट्टी म्हणाले.