जळगाव (प्रतिनिधी) राज्यात शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार सुरु असल्याची टीका एकनाथराव खडसेंनी केली होती. त्यांच्या या आरोपाला मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे तुम्ही म्हणजे संपूर्ण ओबीसी असे समजण्याचे काही एक कारण नाही. सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला, हा आरोप पूर्णतः चुकीचा असल्याचे म्हणत खडसेंवर महाजनांनी जोरदार पलटवार केला आहे. तसेच आपण थोडं शांत रहा, तू तू मै मै करू नका असा टोलाही महाजन यांनी खडसे यांना लगावला आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच जळगावमध्ये आले होते. यावेळी नव्या सरकारचा येणाऱ्या काळातील अजेंडा त्यांनी स्पष्ट केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुढेच जाणार. अडीच वर्षात खुंटलेला विकास आता होईल. हे डबल इंजिनचे सरकार असून रखडलेली सर्व विकासकामे आता मार्गी लागतील असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराला नक्कीच उशीर झाला आहे. मात्र, आता खाते वाटपला उशीर होणार नाही. खाते वाटप लवकरच होणार आहे. 17 ऑगस्टला अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी खाते वाटप होऊ शकते. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस लवकरच योग्य निर्णय घेतील असे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.