मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनंतर आता केंद्रीय पातळीवरूनही नारायण राणेंना पाठिंबा मिळत आहे. अटकेच्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही नारायण राणेंना फोन करून त्यांची विचारपूस केलीये.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नारायण राणेंना फोन केल्याची माहिती भाजपा नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. यावेळी अमित शाहांनी नारायण राणेंशी चर्चा करत त्यांच्याकडून पोलिसांनी केलेले कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशील याबाबत माहिती घेतली. नारायण राणेंच्या अटकेची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता या प्रकरणात भाजपा पुढे काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनाही सावध झाली आहे. भाजपच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असलेल्या खासदार संजय राऊत यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहे. संजय राऊत हे सध्या भुवनेश्वरच्या दौऱ्यावर होते. मात्र, गेल्या दोन दिवसांमधील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय चित्र कमालीचे पालटले आहे. त्यामुळे संजय राऊत भुवनेश्वर दौरा अर्धवट सोडून गुरुवारी तातडीने मुंबईत परतणार आहे. मुंबईत आल्यानंतर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती. त्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात हजर करण्यात आले होते. अखेर रात्री उशिरा नारायण राणेंना जामीन मंजूर झाला होता.