आगरतळा (वृत्तसंस्था) आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब पुन्हा एकदा चर्चेत आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेतही भाजप सत्ता स्थापन करणार, असा आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणारा दावा बिप्लब देब यांनी केलाय. ‘भविष्यातील’ या कामगिरीचं सगळं श्रेयही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देऊन टाकलंय. त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं भाजपनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बिप्लब देब यांनी हे विधान केलं.
बिप्लब देब यांनी एका सभेत बोलताना हे विधान केलं. “२०१८ साली विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अमित शाह यांच्यासोबत अतिथीगृहात बैठक झाली होती. या बैठकीत पक्षाचे नेते अजय जामवाल यांनी म्हटलं की, भाजपनं अनेक राज्यांत सरकार स्थापन केली आहेत. त्यावर अमित शाह यांनी म्हटलं की, अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहेत.” आपण आपल्या पक्षाचा विस्तार शेजारी देशात करून तिथेही सरकार स्थापन करू, पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना दणदणीत पराभव स्वीकारावा लागेल तसंच केरळमध्येही भाजप सरकार स्थापन करेल, असंही बिप्लब देब यांनी म्हटलं. बिप्लब देब यांनी अमित शाह यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. त्यांच्या नेतृत्वात भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष बनल्याचंही देब यांनी म्हटलं.
नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या देशांच्या सार्वभौमाविरुद्ध हे विधान आहे, देब यांच्या या विधानांची चौकशी व्हायला हवी, विरोधकांनी बिप्लब देब यांच्या विधानावर भाजप नेतृत्वानं स्पष्टीकरण द्यावं, असं म्हटलं आहे. सीपीआय (एम) चे नेते आणि माजी खासदार जितेंद्र चौधरी यांनी बिप्लब देब यांच्यावर टीका करताना म्हटलं की, त्यांना लोकशाही आणि घटनेचं आकलन नाहीये. चौधरी यांनी पुढे असंही म्हटलं की, देब यांनी दावा केल्याप्रमाणे अमित शाह यांनी वक्तव्य केलं असेल तर तो भारतानं अन्य देशातील अंतर्गत पक्षांमध्ये हस्तक्षेप करण्यासारखं आहे.