मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआयनंही गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. तसंच सीबीआयला कठोर कारवाई करण्यापासून मज्जाव करण्याचीही मागणी केली आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण ?
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा शंभर कोटी रुपयांची वसुली चे टार्गेट ठेवल्याचा आरोप केला होता याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते या लेटर बॉम्ब मुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा दिला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले सीबीआय कडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यांची चौकशी सुरू केली. या प्रकरणानंतर मात्र राजकीय गोटात एकच खळबळ उडाली. आता मात्र एकीकडे सीबीआय आणि एकीकडं ईडी देखील अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढणार यात शंका नाही.