मुंबई (वृत्तसंस्था) ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. यावर प्रत्युत्तर देत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांनी सोमय्यांना सुनावलं आहे. बॅग भरून तुरुंगात जायला ही काय सहल आहे नाही, असा टोला लगावला.
अनिल परब म्हणाले, “बॅग भरून जेलमध्ये जायला ही काही ट्रीप नसते. कुणीही बॅग भरून जेलमध्ये ट्रीपला जात नाही. मी गुन्हेगार असेन, माझ्यावरील गुन्हे सिद्ध झाले तर मला जी शिक्षा देण्यात येईल ती मला मान्य करावीच लागेल. मात्र, मी गुन्हेगार नसेन आणि तरीही कुणी आरोप करत असेल तर त्याची उत्तरं त्यांनाही द्यावी लागतील. किरीट सोमय्यांकडून बदनामी करण्याचं काम होतंय. खोटी कागदपत्रे दाखवली जात आहेत, त्यावरून भ्रम तयार केला जात आहे आणि सगळे भ्रष्ट आहेत असं दाखवलं जातंय.” ज्याच्यावर विक्रांतचे पैसे खाल्ल्याचा आरोप आहेत त्या व्यक्तीने दुसऱ्यांवर अशाप्रकारचे आरोप करणे हास्यास्पद आहे. याच्या दोन्ही बाजूंनी चौकशा सुरू आहेत. आमचं म्हणणं आहे की चौकशा होऊ द्या. चौकशी अंती खरं बाहेर येईल,” असं अनिल परब यांनी नमूद केलं.
अनिल परब पुढे म्हणाले, “शिवसेनेवर मुंबईकरांचे प्रेम आहे. मुंबईत शिवसेना हवी ही लोकांची भावना आहे कारण अर्ध्या रात्री अडचण आली तर शिवसेनाच लोकांसाठी धावते. विक्रांतचे पैसे खाणाऱ्या किरीट सोमय्यांच्या आरोपांना लोक किंमत देत नाही.”