मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि दापोलीत एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक मोठं विधान केलं आहे. “ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी,” असं किरीट सोमय्या म्हणाले.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, “सचिन वाझेने 100 कोटींच्या वसुलीत अनिल परब यांचं नाव घेतलं होतं. पोलीस बदल्यांमध्ये त्यांचं नाव आलं होतं. त्याआधी एका प्रकरणात ईडी चौकशी करत होती. तसंच लॉकडाऊन असताना अनिल परब यांनी २०-२१ मध्ये दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधलं. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली कोर्टात फौजदारी खटला दाखल केला. अनिल परब यांनी शेकडो कोटींचे गैरव्यवहार केला आहे. आयकर विभागाचे छापे पडले तेव्हा अनिल परब यांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरात साडेतीन कोटी रुपये रोख सापडले. या सगळ्याचं कारवाईमध्ये रुपांतर झालं आहे.”
ते पुढे म्हणाले की, “फौजदारी खटला भारत सरकारने दाखल केला आहे. फसवणुकीची कारवाई ठाकरे सरकारने केली. उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने अनिल परब यांचा काटा काढला. फसवणुकीच्या ऑर्डरवर आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. म्हणून मी आताचं ठाकरे कुटुंब माफिया आहे, असं मी म्हणतो. सगळ्यात पहिली माहिती ठाकरे कुटुंबाला कळते, कारण ते घोटाळे करतात.”