नगर (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर सैनिक सहकारी बँकेतील गैरव्यवहारांबद्दल खुद्द ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन सहकार विभागाने चौकशी केली असून आता या अहवालाची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे अण्णांनी स्वत: या बँकेची स्थापना केली होती.
हजारे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपणही निवृत्त सैनिक आहोत. पारनेर तालुक्यातील इतर सैनिकांनी आग्रह केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सैनिक बँकेप्रमाणेच पारनेर तालुक्यातही सैनिक बँकेची स्थापना करावी असा विचार पुढे आला. त्यासाठी सहकार विभाग आणि भारतीय रिझर्व बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतर १९९६ मध्ये या बँकेला परवाना मिळाला. या बँकेचा संस्थापक अध्यक्ष आपण असल्यामुळे बँकेला ठेवी जमा झाल्या. परंतु मला कोणतीही निवडणूक लढवायची नसल्याने पाच वर्षांनंतर अध्यक्षपदावरून दूर झालो. बँकेच्या अध्यक्ष, संचालकपदाची धुरा इतर माजी सैनिकांकडे सोपवली. बँकेला उज्वल भविष्य लाभावे, ही आपली संकल्पना होती मात्र, अलीकडच्या काळात या बँकेत भ्रष्टाचाराचा शिरकाव झाल्याचे पुरावे आपणाकडे आल्याने दुःख झाले आहे. ते आपल्याकडे देत असून त्याची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.