मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकालाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय. बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे. सीबीएसई प्रमाणेचं हा फॉर्म्युला असणार आहे.
बारावीच्या निकालाचे मुल्यमापन (२०२१) करतांना शासन निर्णय २०१९ मधील विषयनिहाय लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिकाचे अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारीत केलेले गुण कायम ठेवण्यात येतील, असे शासनाने म्हटले आहे. शासनाने यासाठी ३०:३०:४० असा फॉर्म्युला ठरवला आहे.
शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेतील गुण, अकरावीच्या अंतीम परीक्षेतील गुण तसेच बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनातील गुण यानुसार भारांश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे मुल्यामापन करण्यात येणार आहे.
परीक्षेसाठी निर्धारीत एकूण गुणांपैकी ३० टक्के गुण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील, ३० टक्के गुण अकरावीच्या परिक्षेतील तसेच ४० टक्के गुण बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनातील गुण यानुसार भारांश विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे मुल्यांकन केले जाणार आहे.