नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज या वर्षातली सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरपासून ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यासोबतच कोरोना रुग्णसंख्या १ कोटी १४ लाखांवर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात बुधवारी तब्बल २३ हजार १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशाच्या काही भागांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलद व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांना केले. ‘चाचणी करा, रुग्णशोध घ्या व उपचार करा’ या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला. कोरोनास्थिती आणि लसीकरणाबाबत मोदी यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यादरम्यान रुग्णसंख्येने देशवासियांची चिंता वाढवली आहे.
महाराष्ट्रात बुधवारी २४ तासांत २३,१७९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ८४ जणांचा मृत्यू झाला. मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यासह राज्यातील सर्वच भागांमध्ये रुग्ण वाढले आहेत. सप्टेंबरनंतर राज्यात प्रथमच इतकी मोठी दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली. राज्यात ११ सप्टेंबरला सर्वाधिक २४,८८६ दैनंदिन रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. मात्र, आता रुग्ण वाढत असून, दिवसभरात मुंबई २३७७, नाशिक शहर १४९०, पुणे शहर २६१२, पिंपरी-चिंचवड १२०६, उर्वरित पुणे जिल्हा ९०६, औरंगाबाद ९७९, नागपूर शहर २६९८, कल्याण-डोंबिवली ६३७, सातारा ३०३, अकोला शहर ३०३, बुलढाणा ५३२, वर्धा ३६० नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या १ लाख ५२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३२,३५९ रुग्ण उपचाराधीन आहेत.