जळगाव (प्रतिनिधी) कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील मालनगाव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी अनेर, करवंद, अमरावती मध्यम प्रकल्प, असे एकूण 11 मध्यम प्रकल्प, लघु 45 प्रकल्प, को. प. बंधारे 22 व वळण बंधारे 30 असे एकूण 108 प्रकल्प तसेच नंदूरबार जिल्ह्यातील, रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प असे एकूण 3, लघु 33 प्रकल्प, को.प. बंधारे 6, वळण बंधारे 20 असे एकूण 62 तसेच धुळे व नदुरबार, जिल्ह्यातील अधिसुचित नदी / नाले तसेच तापी नदी वरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणारे तमाम बागायतदारांना कळविण्यात येते की, दि. 14 ऑक्टोंबर, 2020 ते 28 फेब्रुवारी, 2021 या कालावधीकरीता दि. 15 ऑक्टोंबर, 2020 पासून सुरु होणारा रब्बी हंगाम 2020-21 मध्ये भुसार/अन्नधान्ये/चारा/डाळी/कपाशी/भुईमुग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याचे कळविण्यात आले आहे.
सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 डिसेंबर, 2020 पर्यंत सादर करावेत. पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी/ नामंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. पाणी नाश/पाळी नसतांना पाणी घेणे/मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे/विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे/व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागायतदारांनी नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.
टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. जाहिर निवेदनामध्ये नमुद केलेल्या विहित दिनांकापर्यत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाव्दारे प्रसिध्द करण्यात येईल. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरीबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. धुळे व नंदूरबार जिल्हयातील काही मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी पाणी आरक्षीत करण्यात आलेला आहे. आरक्षीत पाणी साठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधीत उपविभागाव्दारे शेतीसाठी पाणी अर्ज स्वीकारले जातील. असेही धि. र. दराडे, कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
















