मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. जिवंत लोक भाजपला मतदान करणार नाहीत. गंगेत वाहणारे मृतदेह भाजपला मतदान करणार आहेत का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. उत्तर प्रदेशात अराजकता पसरली आहे. उत्तर प्रदेशात शिवसेना लढणार आहे. परंतु, परिवर्तनाची ताकद ही अखिलेश यादव आणि काँग्रेससारख्या पक्षांकडे आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांनी सर्वांना सोबत घेऊन लढले पाहिजे. अहंकार कसा घात करु शकतो, याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. उत्तर प्रदेशातील जनतेला अखिलेश यादव यांच्याकडून अपेक्षा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजपकडून दलित समाजाच्या सुरु झालेल्या लांगलुचालनावरही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी कुंभस्नान केले. त्यानंतर सफाई कामगारांचे पाय धुतले. आता भाजपचे नेते दलितांच्या घरी जाऊन जेवत आहेत. भाजप नेत्यांच्या डोक्यातून जात कधी जाणार? विशिष्ट जातीच्या लोकांच्या घरी जाऊन जेवत असल्याचा प्रचार भाजपकडून केला जातो. हे ढोंग करु नका. अन्यथा देश पुन्हा एकदा जातीच्या आधारावर विभागला जाईल, असे राऊत यांनी म्हटले.