मुंबई (वृत्तसंस्था) टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद त्रिवेदी यांच्यावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, पण काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची पुष्टी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही केली आहे. कौस्तुभ त्रिवेदी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी आहेत. गेल्या ३ वर्षांपासून त्यांची तब्येत खूपच खालावली होती. या काळात त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं. ते महिन्याभरापूर्वीच रुग्णालयातून घरी परतले होते. मात्र मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी कांदिवली येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.
‘रामायण’मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेल्या आणखी अनेक भूमिकांचंही खूप कौतुक झालं. त्यांनी टीव्ही मालिका ‘विक्रम और बैताळ’ मध्येही काम केलं. या मालिकेनंही छोट्या पडद्यावरही बराच काळ वर्चस्व ठेवलं होतं. अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे देखील गुजराती चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.
















