मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुंबईतून एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी निघाले असता राज्य सरकारचे विमानच उपलब्ध करून न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधी दरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा आता रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदाराचा मुद्या अजूनही प्रलंबित असल्यामुळे वाद पेटला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राज्यपालांवर निशाणा साधला होता. ‘महाविकास आघाडी सरकारने नियमानुसार १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार केली. ती यादी ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. पण महिने उलटले पण अजूनही राज्यपालांनी याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही. – राज्यपाल लवकरच नावं जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाही असं वाटतंय, असं सूचक विधान अजित पवार यांनी नाशिक येथील कार्यक्रमात केलं होतं.
भगतसिंह कोश्यारी हे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. कोश्यारींनी रविवारीच या घटनेविषयी खेद व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली होती.