श्रीनगर (वृत्तसंस्था) पाकिस्तानी दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न भारतीय सैन्याच्या जवानांनी उधळला आहे. या दहशतवाद्यांकडून चार एके-४७, आठ मॅगझिन्स आणि २४० एके रायफल जप्त केल्या आहेत.
माहितीनुसार, उत्तर काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला किशन गंगा नदीपात्रात दोन ते तीन दहशतवादी दोरीच्या सहाय्याने ट्यूबमधून नदीपलीकडे नेत असल्याचे दिसून आले. यानंतर तात्काळ जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. लेफ्टनंट जनरल बी एस राजू यांनी म्हंटले कि, आमच्या सतर्क जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पाकिस्तानचा हेतू अद्यापही बदललेला नाही हे स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत त्यांचा हेतू कायम आहे तोपर्यंत आम्ही लढा देत राहू, असे त्यांनी सांगितले आहे. गुप्तचर यंत्रणांनुसार, पाकिस्तानमध्ये लॉन्चपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी आहेत. वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करुनही त्यांना रोखण्यात आम्हाला यश आले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.