औरंगाबाद (वृत्तसंस्था) आईनेच पोटच्या दोन मुलांची झोपेतच गळा घोटून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शहरासह राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. हत्येचं कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. (Aurangabad Crime News)
औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केल्यावर डॉक्टरांनी दोघा बहिण-भावाला मृत घोषीत केलं. अदीबा फहाद बसरावी (वय ८), आणि अली बिन फहाद बसरावी (वय ४) असं मृत मुलांची नावे आहेत. पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली. त्यावेळी दोन्ही मुलांच्या जन्मदात्या आईनंच रात्री मुलांची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं आहे. मात्र आईनं दोन्ही मुलांना नेमकं का मारलं? याचा मात्र उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. दरम्यान, दोन्ही मुलांची आई मनोरुग्ण असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. औरंगाबादमधील सातारा पोलीस स्थानकात (Satara Parisar Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.