जळगाव(प्रतिनिधी) आपल्या आईने होशील तर ‘टॉप’ हो असा लहानपणी दिलेला कानमंत्र यशस्वी करत ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या संशोधन कार्यातून आणि शेतीत शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यामुळे राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर सर्वांच्या परिचयाचे होत थेट डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पदापर्यंत मजल गाठणारे तसेच शेती आणि मातीसाठी तहहयात काम केलेल्या डॉ.शंकरराव मगर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वेध घेणारे “सागरी लाटा” हे आत्मवृत्त लवकरच ग्रामगौरव प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होणार आहे.
ग्रामीण महाराष्ट्राचे वास्तव आणि सकारात्मक चित्र समाजासमोर उभे करण्याचा वसा घेतलेल्या ग्रामगौरव प्रकाशनाचा हा एक धाडसी आणि नवीन उपक्रम असून “सागरी लाटा” हे आत्मवृत्त
प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम शेतीनिष्ठ शास्त्रज्ञ व जलक्षेत्रात मोठे काम उभारलेले दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शंकरराव मगर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ग्रामीण भागातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत शेती क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेवून प्रदीर्घ कारकिर्द उभारली.डॉ.शंकरराव मगर यांचे कृषी संशोधनातील मोठे योगदान पहाता त्यांचा परिचय अपवादानेच सांगण्याची गरज भासेल.
राहुरी कृषी विद्यापीठात प्राध्यापक ते दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू,कृषी आणि जलसंधारणाच्या शासनाच्या विविध समित्यांचे सदस्य,परदेशी कृषी अभ्यास दौऱ्यात संशोधक म्हणून सहभाग आणि आता शासनाच्या कृषी शिक्षणाचे नवीन धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या डॉ.पुरी त्रयस्थ मूल्यांकन अभ्यास समितीचे ज्येष्ठ सदस्य म्हणून एक वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ.मगर यांच्याकडे पाहिले जाते.कृषी विद्यापीठाच्या शिक्षण,संशोधन आणि विस्तार या मूलभूत क्षेत्रात अत्यंत भरीव आणि दीर्घकालीन परिणाम करणारे कार्य त्यांच्या नावावर आहे.दोन्ही विद्यापीठात काम करतांना शेतकरी आणि शेतीचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठरवून डॉ.मगर यांची वाटचाल राहिली आहे. महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे खरे योगीराज असलेल्या यशवंतराव चव्हाण,डॉ.पंजाबराव देशमुख,डॉ.अण्णासाहेब शिंदे,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील,डॉ.बाळासाहेब सावंत,कृषिरत्न शरदचंद्र पवार,शेतीतज्ञ भाऊसाहेब थोरात,शंकरराव मोहिते-पाटील, पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार,पद्मश्री डॉ. भवरलाल जैन,नानासाहेब जोशी,डॉ.जी.के. झेंडेसर,आबासाहेब लगड व कर्मवीर काकासाहेब वाघ अशा सर्व महनीय व्यक्तिमत्त्वांचा डॉ.मगर यांच्यावर प्रभाव राहिलेला आहे.सोबतच कृषी हाच जीवनाचा कणा असलेल्या ग्रामीण जीवनावरही याचा उत्तम परिणाम दिसून आला. अशा ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा समन्वय साधणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा वेध घेणारे आत्मवृत्त डॉ.मगर यांच्या स्वत:च्या लेखणीतून उतरले आहे.अत्यंत निरलस आणि प्रामाणिक शब्दांत अवतरलेला आणि अनेकांना प्रेरणा ठरेल असा हा “सागरी लाटा” नावाचा चरित्रग्रंथ ग्रामगौरवच्या वतीने प्रकाशित होणार आहे.
• अंतिम मसुद्यावर शिक्कमोर्तब :
मासिक ग्रामगौरवच्या पुण्यातील कॉर्पोरेट कार्यालयात “सागरी लाटा” या आत्मवृत्त प्रकाशनाच्या अंतिम मसुदा,कव्हर पेज तसेच प्रस्तावना यावर शिक्कमोर्तब करण्यासाठी डॉ.शंकरराव मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. यावेळी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.एखादी व्यक्ती प्रशासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाली तरी कामावर असलेली तिची निष्ठा सर्वांना सतत मार्गदर्शक कशी ठरू शकते या गोष्टीची सत्यता डॉ. मगर यांच्याकडे पाहून अनुभवता येते. अत्यंत मौलिक सूचना डॉ.मगर यांनी केल्या.बैठकीला समूह संपादक विवेक ठाकरे,मुख्य संपादिका कु.धनश्री ठाकरे,मानद संपादक दयांनंद कनकदंडे, प्रकाशनाचे सरव्यवस्थापक नितीन साळुंखे,सहसंपादक सौ.नेहा लिमये-काळे,ऑपरेशन युनिट हेड संतोष शेलार, व्यवस्थापकीय प्रमुख कु.भाग्यश्री ठाकरे,जनसंपर्क प्रमुख सौ अस्मिता फाटक-राजे,क्रियेशन विभागाचे सुनिल अडसूळ,सोशल मीडिया युनिट हेड सौ.धनश्री पाचंगे, वितरण प्रमुख सौ.स्नेहा लिंबेकर – पोतदार आदी उपस्थित होते.
“जळगाव सारख्या ठिकाणाहून
सारस्वतांची भूमी असलेल्या पुण्यात येवून ग्रामगौरव प्रकाशन सुरू केल्या केल्याचं अत्यंत अल्पावधीत कृषी आणि जलसंधारणात उत्तुंग कार्य असलेल्या डॉ.एस.एस.मगर यांच्यासारख्या महामहिम व्यक्तीमत्वाचे आत्मवृत्त प्रकाशन म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी संधी आणि उपलब्धी आम्ही मानतो.आमचा सर्व चमू खूप परिश्रमपूर्वक या आत्मवृत्ताच्या प्रकाशनाच्या कामासाठी झोकून काम करीत आहे .”