धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी. आर. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक तथा खान्देशातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी यांच्या “सावळा’ या कवितेची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एफ. वाय. बी. ए.च्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
मराठी विषयांतर्गत “खान्देश रत्नावली’ या पुस्तकात त्यांची “सावळा’ ही अभंग रचना समाविष्ट केली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षापासून बालकवी, प्रा. राजा महाजन, उत्तम कोळगावकर आणि मीनाक्षी पाटील या दिग्गजांसोबत प्रा. चौधरी यांची कविता अभ्यासणार आहेत. प्रा. चौधरी यांनी कोरोना काळात वारीनिमित्त “वारीचे अभंग’ ही अभंग मालिका लिहिली होती. निवड समितीने त्यातील एक अभंग रचना “सावळा’ हिची अभ्यासक्रमासाठी निवड केली आहे. त्यांचा “बंधमुक्त’ हा काव्यसंग्रह, “उध्वस्त’, “माय आंबा’ कथासंग्रह, “अनोखी भिक्षा’ बालकथा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. “काव्यगंध’ या सदरातून त्यांनी महाराष्ट्रातील दोनशेवर लेखक, कवींच्या साहित्य कृतीवर समिक्षा लिहिली आहे. आपल्या कवितेची विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी निवड होणे हा आपल्यासाठी सन्मानाचा क्षण, असे प्रा. चौधरी यांनी सांगितले.