जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी एलसीबीच्या कर्मचाऱ्यांचा जबाब घेऊन कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला आहे. विशेष म्हणजे तीन नोटिसा बजावूनही निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले प्राथमिक चौकशीसाठी हजरच झाले नाहीत.
स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षक पदावर असताना बकाले यांनी त्यांच्याच कार्यालयातील सहायक फौजदार अशोक महाजन यांच्याशी मोबाइलवर बोलताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची ऑडीओ क्लीप समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित करून त्यांची प्राथमिक चौकशी जळगावचे सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडे सोपविली होती. कुमार चिंथा यांनी पाठविलेल्या नोटिसीलाही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
दुसरीकडे अशोक महाजन यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र, ते देखील हजर झाले नाहीत. त्यामुळे चिंथा यांनी एलसीबीच्या कर्मचाऱ्यांचा जबाब घेऊन प्राथमिक कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला आहे. तर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडून काढून घेण्यात आला असून, तो उपअधीक्षक (गृह) संदीप गावीत यांच्याकडे अटकपूर्व जामिनावर आज कामकाज जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बकाले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. दरम्यान, बकालेंच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.