धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी प्र.चा गावातील गोठाण भागात एका तरुणाला पूर्व वैमनस्यातून व नाचण्याच्या कारणावरून चाकूने पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यासंदर्भात अधिक असे की, पूर्व वैमनस्यातून व नाचण्याच्या कारणावरून झालेल्या बोलाचाली वरून संगनमताने राहुल विजय कोळी (वय ३० रा. गोठाण वाडा बांभोरी प्र.चा.ता. धरणगाव) यांचे लहान भाऊ अतुल यास विजय नन्नवरे, संदीप नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे यांनी चपटाबुक्कानी, लाथांनी मारहाण करून अजय नन्नवरे याने त्यांच्याजवळील चाकूने पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चारही आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता सर्वांची ३ दिवसांकरिता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि गणेश बुवा हे करीत आहेत.