मुंबई (प्रतिनिधी) भोसरी भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यानंतर तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील अटक करण्यात आली आहे. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
भोसरी प्रकरणात तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांनी भोसरी येथील जमिनीचे बाजारमूल्य हे २३ कोटी रूपये असतांना खडसे यांच्या आप्तांसाठी याचे मूल्य २.७ कोटी रूपये इतके केले. यातून गैरव्यवहार झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. त्यामुळेच रवींद्र मुळे यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रसंगी मुळे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी ते चौकशीत सहकार्य करत असून या प्रकरणातील मुख्य संशयित नसल्याने त्यांना अटक करू नये असा युक्तीवाद केला. मात्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी दिली आहे. या प्रकरणात अजून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याने गेल्या आठवड्यातच खडसे दाम्पत्याला प्रोसेस इश्यू करण्यात आलेले आहेत. यानंतर आता चौकशीसाठी अजून समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती ईडीने न्यायालयात दिली.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भोसरी जमीन गैरव्यवहारात आपला हात नसल्याचा दावा केला असला तरी तेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा ईडीने आरोपत्रातून केला होता. या आरोपपत्रात मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून फायनान्स मिळवला असतांनाच खुद्द एकनाथराव खडसे यांनी आपल्या पत्नीच्या नावे ५० लाख ट्रान्सफर करून यातील ३८ लाख रूपये हे भूखंड खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणात सर्व संशयितांना प्रोसेस इश्यू करण्यात आले असून ईडीने अजून समन्स बजावण्यासाठी कोर्टाकडून मुदत वाढवून मागितली आहे. दरम्यान, ईडीने दोनदा एकनाथराव खडसे यांची चौकशी केली आहे. तर ५ जुलै रोजी त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीत या प्रकरणात एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे, गिरीश दयाराम चौधरी आणि तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेले आहे.