जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेचा माजी अवसायक जितेंद्र कंडारेकडे वारंवार अर्जद्वारे आपल्या कष्टाचे पैसे परत मिळण्यासाठी अनेकवेळेस पाठपुरावा करून अनेक ठेवीदार थकले होते. परंतू कंडारेला अटक झाल्याचे समजल्यानंतर एका वृद्ध ठेवीदाराने पुन्हा एकदा नवनियुक्त अवसायकाला पत्र लिहून आपल्या आयुष्यभराची कमाई परत मिळावी, अशी भावनिक साद घातली आहे.
उत्तम दशरथ बांगर (वय ६२ वर्षे ज्ये रा. मु. पो. मातुलठाण, ता. येवला, जि. नाशिक) यांनी अवसायक चैतन्य नासरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी शेती करून उदनिर्वाह करतो. मी ज्येष्ठ नागरिक आहे असून माझी आयुष्यभराची कमाई रक्कम रु. २६,५०,०००/- भाईचंद हिराचंद मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी शाखा येवला येथे ठेवी स्वरुपात ठेवल्या आहेत. परंतू सन २०१५ साली उघडकीस आलेल्या घोटाळ्यापासून अद्यापपावेतो मला ठेवी परत मिळालेल्या नाही.
माजी संचालक व अवसायक जितेंद्र कंडारे यांचेवर कारवाई झाल्याचे समजले. जितेंद्र कंडारे यांनी दि. २७ ऑगस्ट, २०१९ रोजी माझ्या मुळ (ओरीजनल) ठेव पावत्या ठेवून घेवून मला आतापर्यंत फक्त रु.५०,०००/- दिलेले आहे, मी जितेंद्र कंडारे यांचेकडेस वारंवार अर्जद्वारे ठेव रक्कमेची मागणी केली तसेच जळगाव येथील कार्यालय समक्ष भेटण्यास तारीख मिळावी यासाठीही अर्ज केले. परंतू कंडारे यांनी नेहमी उडवाउडवीची उत्तर दिली व समक्षही भेट दिली नाही.
माझे व ६२ वर्षे असून ब्लड प्रेशर तसेच वयोमानानुसार विविध आजरांनी ग्रस्त आहे. माझ्याकडुन आता कोणताही कामधंदा होत नाही. सदरची रक्कम ही माझ्या तसेच माझ्या कुटुंबियांच्या संपूर्ण आयुष्याची जमापुंजी आहे. त्यावरच आमचा वृध्दापकाळ व मुला-बाळांचे भविष्य अवलंबुन आहे. वृध्दापकाळातील अनेक समस्यांनी तोंड वर काढल्याने त्यासाठी खुप खर्च होत आहे. माझे हक्काचे पैसे मिळत नाही व नातेवाईक व इतर कोणही आर्थिक मदत करेनासे झाले यामुळे येथुन पुढे जीवन जगने मुश्कील आहे. आमचा वृध्दापकाळ व मुलाबाळांचे भविष्य अंधारत दिसत असून आत्महत्या हा एकच पर्याय डोळ्यासमोर दिसत आहे. तरी आपणांस प्रत्यक्ष भेटण्याची तारीख मिळावी तसेच माझी ठेव रक्कम लवकरात लवकरत प्रथम प्राधान्याने परत मिळवून देण्यात यावी,अशी विनंती उत्तम बांगर यांनी केली आहे.