मुंबई (वृत्तसंस्था) मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई पोलिसांनी प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी २३ एप्रिलला त्यांच्या खार येथील निवासस्थानातून अटक केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसेचं पठण करण्यासंदर्भात राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. कोर्टाने जामीन देताना राणा दाम्पत्यावर काही अटी लादल्या आहेत. जामीनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही असं राणा दाम्पत्याला सांगण्यात आलं आहे. असा गुन्हा पुन्हा केल्यास जामीन रद्द होऊ शकते हे कोर्टाने स्पष्ट केलं आहे. राणा दाम्पत्याला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.
निकाल लिहून न झाल्याने जामीनासंदर्भात निकाल बुधवारी जाहीर होणार होता. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना 24 एप्रिल 2022 रोजी वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. गेल्या 10 दिवसांपासून राणा दाम्पत्य कोठडीत आहे. खा.नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहे. 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. 353 कलमाअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल आहे. सरकारी कामात व्यत्यय आणल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो.
शनिवारी (23 एप्रिल) खार पोलीस राणा यांच्या निवासस्थानी पोहचल्यानंतर त्यांनी पोलिसांचा विरोध केला. मी गाडीत बसणार नाही अशी भूमिका घेतली. वॉरंट असल्याशिवाय हात लावायचा नाही अशी अनेक वक्तव्य राणा यांनी केली. म्हणून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.