जळगाव (प्रतिनिधी) जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांचा पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून खून झाला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने पाच संशयिताना ताब्यात घेतले आहे.
जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
दरम्यान, आपल्या मुलाच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. त्यामागे त्याचा सहकारी दिलीप राजू चौधरी हाच असल्याचा संशय स्वप्नील याचे वडील रत्नाकर शिंपी व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांवरील दबाव वाढला होता. परंतू खबऱ्यांच्या माध्यमातून एलसीबीच्या पथकाने अखेर पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांची कसून चौकशी सुरु असून आज दुपारी २ वाजेला एलसीबीची टीम पत्रकार परिषद घेऊन अधिकृत अटकेची घोषणा करणार आहे. या संशयितांकडून त्यांना टीप कुणी दिली?, हल्ला त्यांनी कसा घडवून आणला?. बॅगमधील काही रक्कम संशयितांनी खरचं गहाळ केली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.