मुंबई (वृत्तसंस्था) नव्या राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी ४ किंवा ५ जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे गटाकडून नेमकं कोणकोणत्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो, याची सर्वांनाच उस्तुकता लागून आहे. दुसरीकडे भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात असल्याची चर्चा समोर येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचं बोललं जात आहे. तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, अतुल भातखळकर, मनिषा चौधरी यांची नावे आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराजे देसाई यांच्यासह संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा आहे.