मुंबई (वृत्तसंस्था) एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू होते. दरम्यान, राज्य सरकारने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे. ( MPSC New Syllabus Implementation)
या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे.
यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 13 जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आज एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले होते.
आज (३१ जानेवारी) पुण्यातील अलका टॉकिज येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आंदोलकांशी बातचीत करून दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.