मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना पाठोपाठ आता महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ च्या रुपाने आणखी एका संकटाने शिरकाव केल्याचे दिसत आहे. चिकन, अंडी खाणार असाल तर ७० डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. चिकन, अंडी खाणार असाल तर ७० डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. तसेच बर्ड फ्ल्यू बाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. “अंडी किंवा कोंबडी यांना आपण विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवलं, तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनेतला एवढंच सांगणं आहे की, तुम्ही अंडी उकडणार असाल किंवा अंड्यांचे इतर काही पदार्थ करणार असाल, अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवलं पाहिजे. असे केल्यास त्यामधील जीवाणू मरून जातात, जे तुमच्यासाठी सुरक्षित असेल.” असं पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी सांगितलं आहे.
“परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळे झाल्याचे समोर आल्यानंतर, याबाबत बोलताना केदार म्हणाले की, परभणीतील नमूने आम्ही ज्या दिवशी तपासणीसाठी घेतले, त्याच दिवशी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संबंधित परिसर बंद करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. बर्ड फ्ल्यूबाबतच्या चुकीच्या अफवा पसरवून पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. कोरोना संकटाच्या काळात चिकनमधून कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी सरकारने गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली होती, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी, राज्यातील बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी आढावा बैठक घेणार आहेत. ठाणे, दापोली परभणी व नागपूर येथील नमूने आणलेले आहेत. अद्याप केवळ परभणीचा तपासणी अहवाल समोर आला आहे. अन्य ठिकाणच्या नमुन्याचे तपासणी अहवाल येणं बाकी असल्याची माहिती केदार यांनी यावेळी दिली.