कोलकाता (वृत्तसंस्था) गेल्या 10 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका समीप आल्या असल्याने येथे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत ममता सरकार पडणार असल्याचा दावा भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी केला आहे. दरम्यान, भाजपने तृणमूलचे ६२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून पश्चिम बंगालमधील वातावरण तापवले आहे.
तृणमूलच्या काही नेत्यांनी व आमदारांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच भाजप खासदार सौमित्र खान यांनी, तृणमूल काँग्रेसचे 62 आमदारा आमच्या संपर्कात असून, येत्या 15 डिसेंबरपर्यंत ममता सरकार पडणार असल्याचा दावा केलाय. दरम्यान, सौमित्र खान यांनी कालही ममता बॅनर्जी सरकार अस्थिर झाल्याचा दावा केला होता. राज्यपाल जगदीप धनखड हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्याच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देऊ शकतात, असा दावा त्यांनी केला होता. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू बॅनर्जी यांनी तृणमूल कॉंग्रेसची नवी व्याख्या करताना, तृणमूल कॉंग्रेस म्हणजे टेररिस्ट मॅन्युफॅक्चरींग कंपनी असल्याचे म्हटले आहे. या पक्षाची ज्या उद्देशासाठी स्थापना झाली होती, त्या उद्देशापासून पक्ष भरकटला आहे व आता आपण जे बोललो तीच राज्यातील युवकांचीही भावना असल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला आहे.