सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) ‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू आहेत. यांना जे जे लोक विरोध करतील त्यांच्या मागे हे शुक्लकाष्ट लावायचं ही भाजपनं केलेली रणनिती आहे. त्यामुळे त्यांना किती चौकश्या लावायच्या त्या लावू देत,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या इशाऱ्याचा समाचार घेतला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक आणि जामीन प्रकरणात आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात यवतमाळ, नाशिक आणि उत्तर प्रदेशात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी अनिल परब यांच्यावर पोलिस कारवाईसाठी दबाव टाकल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजपच्या या आक्रमकतेवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केलीय.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर ईडी आणि सीबीआय चौकशी लावूनही महाविकास आघाडी सरकार आजही भक्कम आहे आणि उद्याही भक्कम राहील, असा दावाही राऊतांनी यावेळी व्यक्त केलाय. विद्यमान मुख्यमंत्र्यांना एक जबाबदार केंद्रीय मंत्र्याने मारण्याची भाषा करणं हे कितपत योग्य आहे, याचा अभ्यास भाजपने करावा. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर खटले दाखल करण्याची भाषा त्यांनी करावी. मात्र, भाजपला जे करायचं ते करण्यासाठी ते मोकळे आहेत. त्यांचा हात कुणीही पकडलेला नाही. परंतू ज्यावेळेस उद्धव ठाकरेंकडून काही राजकीय टीका झाली तेव्हा ते शिवसेना पक्षप्रमुख होते, आता ते मुख्यमंत्री आहेत, असं राऊत म्हणाले.
राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात येतानाच अपशकुन झाला आहे. सिंधुदुर्गातून सुरुवात करत असताना आता त्याचा शेवट कसा होईल हे लोकांना माहिती आहे. तसंच जेवताना त्यांना अटक करण्यात आली तेव्हा ते जेवत होते असं सांगितलं जातात. पण त्या थाळीतील पदार्थ पाहिले तर राणे जेवत होते की नाटकं करत होते हे दिसून येईल, असंही विनायक राऊत म्हणाले. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी लढत असताना शिवसेनेचे शेवट करु अशी भाषी केली आहे, त्यांचं कसं विसर्जन झालेलं आहे, शेवट करा झालाय याची अनेक उदाहरणं सध्याच्या राजकारणात आहेत, असा टोलाही विनायक राऊत यांनी राणेंना लगावलाय.
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते ?
राणेंना झालेली अटक ही बेकायदेशीर पद्धतीने झाली आहे. या अटक सत्रामध्ये मंत्रिमहोदयांनी हस्तक्षेप केलेला दिसतोय. मुंबई उच्च न्यायालयाचा यामध्ये उल्लेख आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा बदनामी करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला आहे. यासोबतच, ‘या प्रकरणाची सीबीआय चौकशी का होऊ नये? हे सर्व केंद्रीय मंत्र्याबाबत होत असल्यामुळे सीबीआय मार्फत अनिल परब यांच्यापासून ते तेथील स्थानिक आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी आशिष शेलारांनी केली आहे.