जळगाव (प्रतिनिधी) दि. ११ मार्च २०२१ रोजी लखनौ उत्तरप्रदेश येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन इस्लाम धर्माच्या सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुरआनमध्ये बदल करुन त्याच्यात असलेले एकुण आयात मधुन २६ आयात वगळण्यात यावी, अशी मागणी केली आहे. रिजवीच्या या वक्तव्याचे व मागणीचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, जळगाव महानगर जिल्हातर्फे जाहीर निषेध करण्यात आला असुन, समाजात जातीय तेढ व द्वेष पसरविणाऱ्या वसीम रिजवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नुकतेच उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदन सुध्दा देण्यात आले आहे.
सदर निवेदनाचा आशय असा की, पवित्र धर्मग्रंथ कुराण हा मुस्लीम समाजाच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय असल्याने सर्वोच्च न्यायालय लवकरच रिजवीची ही याचिका फेटाळून लावेल अशी आशा संपूर्ण मुस्लीम समाजास आहे. वसीम रिजवी यांनी याचिका दाखल केल्यानंतर माध्यमांना बोलतांना पवित्र धर्मग्रंथ कुराण व इस्लाम धर्माचे सुरुवातीचे तीन खालीफा विरुध्द जाणून बुजून अनेक खोटे व बीनबुडाचे आरोप केले आहेत. त्याच्या या वक्तव्यामुळे इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच इतर धर्माच्या लोकांमध्येही मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र ग्रंथ कुराण बद्दल ही चुकीची माहिती गेल्यामुळे इस्लाम धर्मा बाबत इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वसीम रिजवी यांनी केले आहे.
पवित्र धर्मग्रंथ कुराण मधील युध्द प्रसंग व अत्याचार विरुद्ध लढण्याची शिकवण देणाऱ्या आयती (श्लोक) चुकिच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न वसीम रिजवीने केला आहे. इस्लाम धर्माच्या भावना दुखविणाऱ्या व धर्मा धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या वसीम रिजवी विरुध्द शासनाने भा.द.वि. कलम २९५ व माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करावा व त्यास त्वरीत अटक ही करावी ही भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगांव महानगर जिल्हा तर्फे मागणी करण्यात आली असून सदर निवेदनावर भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शहेबाज शेख, जिल्हाध्यक्ष गुड्डू पठाण, सरचिटणीस मोहम्मद नूर शेख,उपाध्यक्ष सैय्यद युनूस आदींच्या सह्या आहेत.















