सोलापूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या एकीकडे झपाटय़ाने वाढत असताना, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जाताहेत. त्यामुळे पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक केंद्राने तीन महिने पुढे ढकलली असती तर आभाळ कोसळले नसते. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू हे सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. कोरोनाची स्थिती लक्षात घेता काही ठिकाणी तर प्रशासक नेमले. असे असताना केंद्र सरकारने पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक लावली. त्यामुळं आज कोरोनाच्या कठीण काळात सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्गाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री कडू हे सोलापूर शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन प्राप्त परिस्थितीचा आढावा घेतला. पंढरपूर-मंगळावेढ्याचे दिवंगत आमदार भारत नाना भालके हे पक्ष-संघटना बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते. प्रसंगी आम्हाला मदत करत होते. म्हणून त्यांच्या रिक्त जागेवर त्याचा पुत्र उभा आहे. त्याला मदत करण्यासाठी आम्ही प्रचारासाठी आलो, असा खुलासा त्यांनी केला. राज्यात सध्या कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सर्व नियम मोडले जात आहेत असा प्रश्न यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी भाजपला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. पंढरपूरची ही निवडणूक तीन महिने पुढं ढकलली असती तर काय आभाळ फाटलं नसतं ? पण सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे, त्यांनीच ही निवडणूक लादली. मग नाईलाजाने अस्तित्व दाखवण्यासाठी आम्हाला प्रचारात उतरावं लागत आहे अशी पुस्तीही मंत्री बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना जोडली. मात्र या सभांना होणारी गर्दी आणि त्याचे परिणाम या प्रश्नांना मात्र त्यांनी बगल दिली.