मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरणात सहभागी करून घेण्यास हिरवा कंदील दाखवला होता. येत्या १ मेपासून या वयोगटासाठी लसीकरण सुरु होणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणीही सुरु होईल. अशावेळी आता मुंबईत इतक्यात १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस नका देऊ नका, अशी मागणी मुंबई महापालिकेने केली आहे.
मुंबईत कोरोना लसींचा मर्यादित साठा उपलब्ध आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील तरुणांना इतक्यात कोरोना लस देता येणार नाही, अशी भूमिका मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली आहे. आयुक्त यासंदर्भात राज्य सरकारला पत्रही लिहणार असल्याचे समजते.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं, ‘लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आम्ही नेहमीच दिवसाला एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, हे लक्ष्य आम्हाला एकदाही गाठता आलेलं नाही. लसीचा तुटवडा हे यामागील कारण होतं. त्यामुळंच आता लसीचा पुरेसा साठा झाल्यानंतरच १८ वर्षांवरील मुंबईकरांसाठी लसीकरण सुरू करण्याचा आमचा मानस आहे. राज्य सरकारलाही आम्ही याबाबत कळवलं आहे,’ असं ते म्हणाले.
‘मुंबईत १८ ते ४४ या वयोगटातील लोकसंख्या ५० ते ६० लाखांच्या घरात आहे. या सर्वांच्या लसीकरणासाठी आम्हाला किमान १ कोटी २० लाख डोसची गरज लागणार आहे. महापालिका स्वत:हून लस घेऊ शकत नाही. त्यामुळंच पुरवठ्याची हमी मिळत नाही तोपर्यंत फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू ठेवण्यात येईल. या निर्णयावरून टीका झाली तरी त्यास सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. कारण, आमची भूमिका व्यवहार्य आहे. लसीचा पुरेसा साठा नसताना लोकांना लसीकरणासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन करणं निरर्थक आहे,’ असं ते म्हणाले.