धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथील एका शेतकऱ्यानं मुलगा, पत्नी आणि घरातील सर्व अन्य मंडळी झोपी गेले असता, मध्य रात्री शेतात जाऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तत्पूर्वी आत्महत्येची सर्व तयारी झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला आणि नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडतोय’ अशी माहिती दिली.
यासंदर्भात अधिक असे की, कैलास धनसिंग पाटील असं आत्महत्या करणाऱ्या ५५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवासी आहे. त्यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्वजण झोपल्याचं पाहून घराबाहेर पडले. त्यानंतर रात्री पावणे तीनच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलासह जवळच्या चार नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडून जातोय’ अशी माहिती दिली. झोपेत असणारे हे चारही जण खडबडून जागे झाले. त्यांनी कसलाही विचार न करता, बॅटरी घेऊन काळोखातून मार्ग काढत शेताच्या दिशेनं धाव घेतली. दरम्यान शेताच्या दिशेनं बॅटरी चमकल्याचं दिसताच पाटील यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. त्यांनी आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. यानंतर नातेवाईकांनी तातडीनं त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.