भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेश भाजपाचे राज्य प्रभारी पी मुरलीधर राव यांनी आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पी मुरलीधर राव यांच्या ब्राह्मण आणि बनिया समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘ब्राह्मण आणि व्यापारी मतदार माझ्या खिशात आहेत’ असं वक्तव्य राव यांनी केलंय.
‘भाजपला ब्राम्हण आणि बनिया (व्यापारी) राजकीय पक्ष म्हटलं आणि आता भाजपमधून एससी-एसटी वर्गावर लक्ष देणार असल्याचं म्हटलं जातं. परंतु, भाजपची घोषणा मात्र ‘सबका साथ, सबका विकास’ आहे. भाजप जातीच्या आधारावर मतदारांना सामोरं जाणार का?’ असा प्रश्न काही पत्रकारांनी राव यांना सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना पी मुरलीधर राव यांनी आपल्या कुर्त्याच्या खिशाकडे इशारा करत ‘ब्राम्हण आणि बनिया तर माझ्या खिशात आहेत… तुम्ही आम्हाला ब्राम्हण आणि बनिया पक्षा म्हटलं, जेव्हा याच वर्गातून अधिक कार्यकर्ते आणि मतदार पक्षात होते. आम्ही एससी-एसटी वर्गाच्या लोकांना जोडण्याचं काम करत आहोत कारण त्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे. परंतु, भाजप ब्राह्मण आणि व्यापाऱ्यांसहीत कोणत्याही वर्गाला सोडणार नाही. ज्यांनी अनेक गोष्टींत मागे सोडण्यात आलं होतं त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घ्यायचा भाजपचा प्रयत्न आहे’, असं वक्तव्य राव यांनी केलं होतं. भाजप सरकार अनुसूचित जाती आणि जमातींकडे ‘व्होटबँक’ म्हणून पाहत नाही. तर त्यांचं मागासलेपण, रोजगार आणि शिक्षण यांसारख्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यावर विशेष लक्ष देत आहे, असा दावा राव यांनी केला.