मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन केले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांचे एक वाक्य सांगत राजकारण्यांना सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेज आणि ट्वीट अकाउंटवर महात्मा गांधींना अभिवादन करत एक पोस्ट लिहिली आहे.
राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणाले की, ‘आज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं ह्यातच गांधींजीना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि एखादी चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना, ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय. त्यांच्यात अहंभाव नव्हता, ‘माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे,’ हे सांगण्याचा प्रांजळपणा होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिपेक्षातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं हे सुरू झालं आहे.
‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’ हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. कोरोनाच्या ह्या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरू आहे. त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील.’ असे ही राज ठाकरे म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देऊन व्यक्त होते. महात्मा गांधी यांच्या विचारांचे ट्वीट करून राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना सल्लावजा टोला लगावला आहे.