मुंबई (वृत्तसंस्था) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण 5 राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी – केला आहे. त्यामुळे राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर ५ वर्षे निवडणूक लढवण्यापासून ते मतदान करण्यापर्यंत बंदी घालावी, अशी कायदेशीर नोटीस अॅड. असीम सरोदे, अॅड. किशोर वरक, अॅड. श्रीया आवळे यांच्यामार्फत राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. यासोबत राणे समर्थकांचा मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटतानाचा व्हायरल व्हिडीओ जोडण्यात आला आहे. आता आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले. राणेंना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही, अशी धमकी १३ एप्रिल रोजी झालेल्या सभेत दिली. राणे कुटुंबाने आणि भाजप समर्थकांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे. लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ७ दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे, असेही यामध्ये म्हटले आहे. भ्रष्टाचाराने राणे निवडून आल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती राऊत यांनी दिली. तर अनेक ठिकाणी पारदर्शक पद्धतीने मतदान आणि मतमोजणी झालेली नाही. अॅड. असीम सरोदे यांनी आरोप करताना म्हटले आहे की, निवडक पद्धतीने भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे, भाजपच्या लोकांनी केलेल्या हरकतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रकार घडला. काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकशाही यंत्रणेचा गैरवापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ही नोटीस बजावली आहे.