मुंबई (वृत्तसंस्था) “राज्यात कोरोनाची स्थिती भीषण होत चालली आहे. देशातील ५० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला लस द्यावी,” अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
कोरोना विरोधी लसीच्या पुरवठ्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्राकडून लसीचा पुरवठा केला जात असला तरी त्याचा वेग अतिशय मंद असल्यानं आवश्यक लसींचा साठा नसल्याची टीका राज्य सराकरकडून केली जात आहे. केंद्राकडन केल्या जाणाऱ्या दुजाभावामुळे जनतेचे हाल होत असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. तर राज्यांच्या गरजेनुसार आणि लसीकरणाची क्षमता पाहून केंद्राकडून लसीचा पुरवठा सुरू आहे. यात महाराष्ट्रालाच सर्वाधिक लसीचा पुरवठा आजवर झाला आहे, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.
राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले असले तरी रुग्णसंख्या काही कमी होत नाही. त्यामुळे निर्बंधांनी काहीच होणार नाही. राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
“गृहविभाग परमबीर सिंग यांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात जो दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं म्हणत या संपूर्ण प्रकरणात राजकारण होत आहे. NIA ची गुप्त चौकशी सुरु आहे. मग त्यांच्या कोठडीतून सचिन वाझेने लिहिलेले पत्र बाहेर कसे काय येतात?” असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितीत केला आहे.