कोल्हापूर (वृत्तसंस्था) राजकारण सोडून हिमालयात जाण्याची भाषा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पुन्हा एकदा टोला हाणला. ‘चंद्रकांतदादांना हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला इथेच त्यांची गरज आहे,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलेलीच नाही,’ असं मुश्रीफ म्हणाले. ‘विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेलं आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळं चंद्रकांतदादांसाठी राजीनामा कोण देणार? कशासाठी? हे होणार नाही, हे दादांनाही माहीत आहे. त्यामुळंच ‘चंद्रकांतदादां हिमालयात जाण्याची भाषा करत आहेत,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ‘ज्या कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांतदादा निवडून आले आहेत, ती जागा सोडण्याची परवानगी भाजप कशी देईल? दोन्हीही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळं पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला तुमची इथेच गरज आहे,’ असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. आजही कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील आमदाराने राजीनामा द्यावा, पोटनिवडणूक लावावी. मी निवडणूक लढायला तयार आहे. तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन,’ असं पाटील म्हणाले होते.