औरंगाबाद (वृत्तसंस्था) मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे औरंगाबादला सभा घेत आहेत. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत भाषण करत भाजपवर निशाणा साधला. काहीजण औरंगाबादमध्ये आले आणि गेले, पण मराठवाड्यामध्ये शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. संजय राऊत म्हणाले की, “देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्याची झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. मोदी शाहंना या झळा बोलत नाहीत. महागाईवर बोललं तर ते ज्ञानवापी मशिदीवर बोलतात. पण कैलासवरील शिवलिंग चीनच्या ताब्यात आहे, ते त्यांनी परत मिळवावं. पण ते यावर बोलणार नाहीत.”
सुभाष देसाई काय म्हणाले?
येत्या दोन वर्षामध्ये जायकवाडी ते औरंगाबाद शुद्ध पाणीपुरवठ्याचं काम पूर्ण होणार असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं. औरंगाबादला आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली असून पाणीपट्टीही अर्ध्यावर आणली आहे. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने पारित केला आहे, पण केंद्राकडून अद्याप त्यावर कारवाई करण्यात आली नाही असं सुभाष देसाई म्हणाले.