उदगीर : अनैतिक संबंधाच्या कारणावरून घरात घुसून डोळ्यांत मिरची पावडर टाकत दोरीने गळा आवळून एकाचा सहा जणांनी निर्दयीपणे खून केल्याची घटना तालुक्यातील चोंडी येथे गुरुवारी (दि. २५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात सहा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर अन्य चार आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सूर्यकांत ऊर्फ बाबू बिरादार, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गुरुवारी (दि. २५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चोंडी (ता. उदगीर) येथील मयत सूर्यकांत ऊर्फ बाबू सुदाम बिरादार (५०) यांच्या घरी संशयित आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवत मयत झालेल्या इसमाचे आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपींनी मयत सूर्यकांत ऊर्फ बाबू बिरादार यांच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यांना काठीने मुक्का मार देण्यात आला. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला, अशी फिर्याद मयताचे जावई फिर्यादी श्यामराव शिवाजी वाघमोडे यांनी दिली. त्यावरून वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात आरोपी शुभम ऊर्फ छकुल्या संजीव बिरादार, बालाजी ऊर्फ पप्प्या संजीव बिरादार, केवळबाई संजीव बिरादार, कचरू जीवन डोईफोडे, लक्ष्मण जीवन डोईफोडे, विलास जीवन डोईफोडे (सर्व रा. चोंडी, ता. उदगीर) यांच्याविरुद्ध वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३१/ २४ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ भा. दं.वि. आणि १३५ म.पो. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या खुनातील संशयित आरोपी शुभम ऊर्फ छकुल्या संजीव बिरादार आणि बालाजी ऊर्फ पप्प्या संजीव बिरादार या दोघांना अटक केली आहे. अन्य चार आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड़ करीत आहेत.