बिहार (वृत्तसंस्था) बिहार विधानसभेच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या चिराग पासवान यांच्या लोजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. या विजयानंतर चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि भाजपचं अभिनंदन केलं आहे.
चिराग पासवान म्हणाले की, निकालानंतर बिहारचा विश्वास पंतप्रधानांवर आहे हे स्पष्ट झालं आहे. मी भाजप आणि पंतप्रधानांचं अभिनंदन करतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट १२५ जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. मला आनंद आहे की लोकजनशक्ती पार्टीला मिळालेला प्रतिसादाबद्दल. एकटे लढूनही २५ लाख मतं आणि ६ टक्के व्होट शेअर मिळाला. यामुळे पक्षात उर्जा निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले आहे. २०२५ ला आम्ही ताकदीने मैदानात असू, असं चिराग पासवान म्हणाले. बिहारमध्ये NDA ने १२५ जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. तर महागठबंधननं ११० जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली आहे. भाजपला २०१५ मध्ये ५३ जागा मिळाल्या होत्या तर यंदा ७४ जागा मिळाल्या आहेत. तब्बल २१ जागा जास्त जिंकून भाजपनं चांगलं यश मिळवलं आहे. चिराग पासवान यांच्या लोजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. त्यांनी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत १४३ जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते.
चिराग पासवान म्हणाले की, बऱ्याच जागी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. बहुतेक जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. २०२५ चं जे लक्ष्य आहे त्याच्या आम्ही अगदी जवळ पोहोचलो आहे, असं चिराग पासवान म्हणाले.