धरणगाव (प्रतिनिधी) – ग्रामीण भागात डोळ्यांच्या आजारांबाबत जनजागृती व्हावी यासाठी धरणगावात अनुलोम संस्था आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत झालेल्या शिबिरात नागरिकांची मोतीबिंदू आणि इतर डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गरजू रुग्णांना अत्यल्प दरात चष्मे देण्यात येणार असून, ‘कांताई नेत्र संजीवनी योजने’अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गंभीर आजार आढळलेल्या काही रुग्णांना पुढील उपचारासाठी कांताई नेत्रालय, जळगाव येथे रेफर करण्यात आले.
शिबिरात धरणगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या सामाजिक उपक्रमासाठी कृपा ॲक्वाचे संचालक भिमराज पाटील आणि मनिषा पाटील यांनी सहकार्य केले. शिबिराच्या यशासाठी अनुलोममित्र अभय मराठे, राजेंद्र पाटील आणि विकास पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला. संस्थेचे प्रतिनिधी प्रवीण दांडगे, नयना पाटील, ऋषिकेश बारी, निकिता चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













