
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या परिस्थितीबाबत आणि त्या अनुषंगाने राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाद्वारे त्यांनी जळगाव जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले होते, ज्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या सर्वेक्षणात २,०४८ बालके कमी वजनाची असून ३,८१४ बालके तीव्र कुपोषित (SAM) असल्याचे निदर्शनास आले होते.
यावर महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, ‘पोषण ट्रॅकर’ प्रणालीद्वारे बालकांच्या वजनाची आणि उंचीची नोंद घेऊन त्यांची श्रेणी निश्चित केली जाते. मंत्री महोदयांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात मार्च २०२५ मध्ये कुपोषणाचे प्रमाण ०.३९ टक्के होते, ते मार्च २०२६ मध्ये घटून ०.३१ टक्क्यांवर आले आहे. कुपोषण कमी करण्यासाठी सरकारतर्फे सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ‘टेक होम रेशन’ (THR) दिले जात आहे, तर तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रांवर गरम ताजा आहार पुरवला जात आहे. तसेच, तीव्र कुपोषित बालकांसाठी ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिशिअस फूड’ आणि ‘पोषण अभियाना’द्वारे बालकांच्या आयुष्यातील ‘पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ या कालावधीबद्दल व्यापक जनजागृती केली जात असल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

















