
जळगाव (प्रतिनिधी) – कुलुपबंद असलेल्या घरात डल्ला मारुन तेथून ऐवज लांबविणाऱ्या टोळीचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीने ९ घरफोडींसह चार चोरलेल्या दुचाकी असा एकूण दहा गुन्ह्यांची कबुली दिली. या टोळीतील सदस्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. कारागृहातून सुटताच तो पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु केले, मात्र पोलिसांनी तपासचक्रे फिरवित त्यांच्या मुसक्या आवळल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुलूप बंद घरांना लक्ष्य करुन घरफोडीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार सपोनि नयन पाटील, पीएसआय विजय पाटील, परिक्षाविधीन पीएसआय यज्ञजीता येडले, गुन्हे शोध पथकातील पोहेका प्रदीप राजपूत, अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोना कैलास इंगळे, प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दीपक देवरे चालक अशोक पाटील व पंकज देशमुख यांचे पथक तयार केले.
९ घरफोडीसह चार दुचाकींची उकल
टोळीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या ९ घरफोडींसह १ दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून इतर तीन अशा एकूण चार चोरलेल्या दुचाकी व २ लाख ३० हजार जार रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने आणि तांबे पितळाची भांडी असा ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
नागपूर कारागृहातून सुटताच पुन्हा सक्रिय
या टोळीच्या मोहरक्या गुरुजीतसिंग बावरी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी जिल्हापेठ व तालुका पोलीस ठाण्यात १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला एका वर्षासाठ नागपुर कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केली होती. परंतू कारागृहातून सुटताच त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु केले होते. मात्र तालुका पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर केले जेरबंद
पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर तसेच तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या टोळीतील संशयितांना निष्पन्न केले दरम्यान, ही टोळी तांबापुरा परिसरातील असल्याची माहिती मिळताच पोलिसांन सापळा रचून या टोळीचा मुख्य सूत्रधार गुरुजीतसिंग सुजानसिंग बावर (वय २६, शिरसोली नाका), दीपक बापू पाटील (वय २३, पंचशिलनगर) राजेश माणिक राठोड (वय २४, तांबापुरा), सुमित संजय कोळी (वय १९ रामेश्वर कॉलनी) व महेश उर्फ संतोष भोई (वय २४, रा. तांबापुरा) यांच्य मुसक्या आवळल्या.

















