
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओचा डोस दिल्यानंतर एका बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने नातेवाईकांना रात्रभर मृतदेह मांडीवर घेऊन बाहेर बसावे लागले होते. या संवेदनशील प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारला.
या प्रश्नाला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, १२ मे २०२६ रोजी टहाकळी येथे नियमित लसीकरण सत्रात संबंधित बालिकेला पेंटाव्हॅलेंट आणि ओपीव्ही लसीचे डोस देण्यात आले होते. त्यानंतर दीड ते दोन तासांत तिची प्रकृती बिघडल्याने खासगी रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले.
मृतदेहाच्या शवविच्छेदनाबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्र हॉस्पिटल मॅन्युअल आणि कायदेशीर कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, जसे की मृत्यू प्रमाणपत्र, पोलीस आदेश आणि इन्क्वेस्ट पंचनामा उपलब्ध नसल्यामुळे त्या वेळी शवविच्छेदनाची कार्यवाही होऊ शकली नाही. या बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हास्तरीय ‘एईएफआय’ (Adverse Events Following Immunization) समितीमार्फत चौकशी सुरू आहे. तसेच, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने २५ जून २०२६ रोजी चौकशी समिती गठीत केली असून, त्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.
















