अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादपूर,शिरसोदे व महाळपुर या तीन गावांना प्रचंड पाणीटंचाई मुळे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी २०१४ पासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू असताना आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने या तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असल्याने तिन्ही गावात आनंदोत्सव साजरा होत आहे.
तामसवाडी धरणावरून सुमारे १३ ते १४ किमी पाईपलाईन टाकून ही योजना निर्माण होणार असून यासाठी ११६८.३० लक्षच्या अंदाज पत्रकास जलजीवन मिशन अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. वरील तीन गावांच्या दृष्टिकोनातून हे अतिशय मोठे काम आमदारांनी मार्गी लावल्याने बहादरपूर, शिरसोदे आणि महाळपुर या गावातील ग्रामस्थ कमालीचे सुखावले आहेत.सदर पाणी पुरवठा योजनेसाठी दिनांक २७ जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे, महाळपुर सरपंच सुधाकर पाटील तसेच शिरसोदे ग्रामपंचायत उपसरपंच ए आर पाटील, शालिग्राम बडगुजर राकेश गुरव, महाळपुर माजी उपसरपंच प्रभाकर पाटील, गुलाब पाटील आदी ब उपस्थित होते. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत बहादरपूर शिरसोदे महाळपुर तीन गाव पाणीपुरवठा योजनेस रु.११६८.३० लक्ष् रुपयाच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर मंजुरीचे पत्रक तिन्ही गावांच्या लोकप्रतिनिधींच्या हाती सुपूर्द करण्यात आले.
२०१४ पासून सुरू होते प्रयत्न
सदर योजनेच्या मंजुरीसाठी पंचायत समिती माजी उपसभापती चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहादरपूर, शिरसोदे आणि महाळपुर या तिघा गावांची मिळून शिखर समिती बनविण्यात आली होती. या शिखर समितीतील अध्यक्ष संतोष पाटील (महाळपुर) व सर्व सदस्य तसेच बहादरपूर सरपंच भिकन पारधी व सर्व सदस्य शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे व सर्व सदस्य तसेच महाळपुर सरपंच सुधाकर पाटील व सर्व सदस्य तसेच मागील ग्रामपंचायत येथील माजी सरपंच शिरसोदे अशोक महाजन, शामराव आधार पाटील, भारती धनराज पाटील, डी आर पाटील, रतन भिल, कमलबाई विठ्ठल भोई, अनिल ठाकरे व सर्व सदस्य बहादरपूर माजी सरपंच निंबा चौधरी, मिलिंद मोरे, रमेश वाणी, चंद्रकांत जावरे व सर्व सदस्य महाळपुर माजी सरपंच प्रतिभा पाटील, सुशीला पाटील, प्रमिला पाटील, सुरेखा पाटील व सर्व सदस्य तसेच या योजनेसाठी या तीनही गावातील ग्रामस्थ यांनी वेळोवेळी परिश्रम घेतले. यासाठी २०१४ पासून पाठपुरावा सुरू असताना मंजुरीची प्रतीक्षा कायम होती. अखेर आमदार अनिल पाटील यांनी हा प्रश्न मनावर घेतल्याने तामसवाडी धरणावरून ही योजना मंजूर झाली आहे. बहादरपूर श्रीक्षेत्र बद्रीनारायण मंदिरासाठी तीर्थक्षेत्र पर्यटन विकास अंतर्गत रुपये रु. ४ कोटी २६ लाख रुपयाची मागणीही आमदारांकडे केली आहे. याव्यतिरिक्त शिरसोदे येथील अपूर्ण असलेला साठवण बंधारा लवकर पूर्ण व्हावा यासाठीदेखील निधीची मागणी करण्यात आली असून त्यासाठी देखील लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिले आहे.
आमदारांमुळे टंचाईग्रस्त गावांना मिळणार दिलासा
शिरसोदे ,बहादरपूर आणि महाळपुर या गावांचा पाणीप्रश्न अतिशय बिकट होता. या तिन्ही गावामध्ये ४ ते ५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. तो देखील जानेवारी महिन्यानंतर बंद होऊन त्यानंतर मोठ्या टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात होते. मात्र, या नविन योजनेमुळे या गावांचे पाणी संकट कायमस्वरूपी दूर होऊन योजना पूर्णत्वास आल्यानंतर किमान १ दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
आमदारांनी आश्वासनच नव्हे तर मंजुरीपत्रकच हाती ठेवले
वरील तिन्ही गावांना आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांची खैरात देत ग्रामस्थांना अनेकवर्षं पाण्यापासून वंचित ठेवले. अनेकदा आश्वासनंतर लोकांनी मतदान करूनही अश्वासनाची पूर्ती मात्र कुणीही केली नाही. प्रत्यक्षात कुणीही लोकप्रतिनिधीने सदर योजनेसाठी राजकीत पाठबळच न वापरल्याने या योजनेच्या मंजुरीस गती मिळू शकली नाही मात्र आमदार अनिल पाटील हे एकमेव पाहिले आमदार ठरले की ज्यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून योजना मंजुरीचे आश्वासन जरी दिले. तरी लागलीच मंजुरी पत्र देखील हाती ठेवले अशी भावना ग्रामस्थांनी यानिमित्ताने बोलून दाखवली.
















