सोलापूर (वृत्तसंस्था) अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी साडेनऊच्या सुमाराला सोलापुरात आगमन झाले. विमानतळावर पोहोचताच त्यांनी आपला ताफा शेतकऱ्यांच्या बांधावर घेण्याचे सांगितले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नुकसान भरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे. गावकऱ्यांनी धीर सोडू नये, अशा शब्दांत ठाकरे यांनी ग्वाही दिली.
मुंबईहून विमानाने सोलापुरात दाखल झाल्यानंतर ठाकरे हे थेट अक्कलकोटकडे रवाना झाले. तेथील बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणा-या पुलावर जाऊन त्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. मात्र तत्पूर्वी, गावक-यांनी मुख्यमंत्र्यांनी पुलावरून नुकसानीची पाहणी न करता थेट गावात, बांधावर येऊन पाहणी करावी आणि तेथील अडचणी प्रत्यक्ष गावक-यांशी बोलून जाणून घ्याव्यात, अशी मागणी केली होती. जेथून मुख्यमंत्री ठाकरे हे दोन्ही गावांच्या शिवारातील नुकसानीची पाहणी करणार होते, तेथे गावक-यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
तथापि, जेव्हा मुख्यमंत्री तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी पुलावर जाण्यापूर्वी गावच्या वेशीवर थांबून गावक-यांशी छोटेखानी संवाद साधला. गावक-यांची निवेदनेही त्यांनी स्वीकारली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडून नुकसानीच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यांच्या समवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित होते.