मुंबई (वृत्तसंस्था) दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा लाबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. यंदा १० वी स्टेट बोर्डाच्या परीक्षा १ मेनंतर आणि १२ वीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर अपेक्षित असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे शाळांपासून, महाविद्यालयं आणि सर्वच शिक्षण संस्थांवर परिणाम झाला आहे. त्यात परिस्थितीत हळूहळू पूर्ववत होत असल्याचे दिसत आहे. अशातच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी १२ वी आणि १० वीच्या स्टेट बोर्डाच्या परीक्षांच्या अपेक्षित तारखा सांगितल्या आहेत. यंदा १० वी स्टेट बोर्डाच्या परीक्षा १ मेनंतर आणि १२ वीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर अपेक्षित असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. इयत्ता ५ ते इयत्ता ८ वीपर्यंत राज्य शालेय माध्यम शाळा या पुढील परिस्थितीतवर ठरवण्यात येईल. सध्या नव्या स्टेंटची भीती असल्या कारणाने रूग्ण संख्या वाढते की कमी होते, परदेशात कोरोना नव्याने विषाणू याचा नेमका काय परिणाम होतो..याचा अंदाज घेऊनच इतर शालेय वर्ग सुरू करण्साचे ठरवण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
दरम्यान ३१ डिसेंबर रोजी CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीची परीक्षा (CBSE Board class 10th exam date) आणि बारावीची परीक्षा ४ मे ते १५ जुलै या दरम्यान होईल असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली. कोविड -१९मुळे यंदाचं शैक्षणिक वर्षं लांबलं. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षाही उशीरा घेण्यात येत आहेत. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल १५ जुलैच्या आत लागतील, अशीही घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली.
दरम्यान, याआधी राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. वर्षा गायकवाड यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती. दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.















